तासगाव : चिंचणी (ता. तासगाव) येथील अनेक शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला वहिवाटीचा शेतरस्ता जेसीबीच्या सहाय्याने चर खोदून, बांध घालून, डांब रोवून व तारेचे कंपाऊंड करून बंद करण्यात आल्याचा आरोप शेतकरी खातेदारांनी केला आहे. हा रस्ता तातडीने खुला करून रस्ता बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पिकांचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चिंचणी येथील विजय विठ्ठल पाटील, गुणवंत शिवाजी माने यांच्यासह अन्य शेतकरी खातेदारांनी हे निवेदन दिले आहे. संबंधित शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून, अनेक पिढ्यांपासून याच रस्त्याचा वापर शेतीच्या कामासाठी केला जात आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे, पिकांना औषधांची फवारणी करणे तसेच तयार झालेला शेतीमाल वाहनांद्वारे बाहेर नेणे यासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मणेराजुरी येथील काही खातेदारांनी तासगाव-मणेराजुरी महामार्गालगत खरेदी केलेल्या क्षेत्राच्या शेवटी जेसीबीने मोठी चर खोदून, बांध घालून आणि तारेचे कंपाऊंड करून पूर्वीपासून सुरू असलेली वहिवाट बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
रस्ता बंद झाल्याने शेतातील पिकांची मशागत, तणनाशक व कीटकनाशक फवारणी तसेच पिकांची काढणी आणि वाहतूक रखडली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, रस्ता खुला करण्यासाठी संबंधितांना समजावण्याचा प्रयत्न केला असता शिवीगाळ करून धमकीवजा भाषा करण्यात आल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
वहिवाटीचा रस्ता अडविणे कायद्याने गुन्हा असल्याने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, रस्ता तातडीने खुला करावा आणि रस्ता बंद केल्यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अन्यथा शेतकरी आंदोलन करतील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर विजय विठ्ठल पाटील, गुणवंत शिवाजी माने, फुलाबाई नानासाहेब माळी, शिवाजी नामदेव माळी, श्रीरंग बाजीराव चव्हाण, सुबराव जनार्दन पाटील, संभाजी गोविंद माळी, शालन माधवराव पाटील यांच्या सह्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या