छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजात व्यवस्थापकीय स्तरावर होत असलेल्या मनमानीमुळे महामंडळाचे अध्यक्षपद केवळ शोभेचे बनले असून, लाभार्थ्यांना न्याय मिळत नसल्याने मराठा समाजात सरकारविरोधी तीव्र नाराजी निर्माण होत आहे. या परिस्थितीतही शासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तर अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा स्पष्ट इशारा महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी शुक्रवारी दिला.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत लाभार्थ्यांवर अनावश्यक आणि अव्यवहार्य अटी लादल्या जात असून, त्यामुळे अनेक पात्र युवकांना योजनांचा लाभ मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला.
नरेंद्र पाटील म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असलेली संमतीपत्रे वेळेत दिली जात नाहीत. तसेच कर्जावरील व्याज परताव्याची रक्कमही मोठ्या प्रमाणात रखडली आहे. महामंडळाच्या योजनांनुसार सुमारे १,५०० कोटी रुपयांचा व्याज परतावा मिळणे अपेक्षित असताना आजपर्यंत केवळ १५२ कोटी रुपयेच वितरित करण्यात आले आहेत. या विलंबाला व्यवस्थापकीय संचालकांची मनमानी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
याबाबत आपण अनेकदा मुख्यमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी आणि पत्रव्यवहार केला असूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. व्यवस्थापकीय संचालकांची बदली अथवा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा समाजातील युवकांसाठी महामंडळामार्फत चारचाकी वाहने खरेदी करून रोजगार सुरू करण्यासाठी कर्ज दिले जात होते. मात्र, आता "वाहने जास्त झाली आहेत" हे कारण पुढे करून ही योजना बंद करण्यात आली आहे. कोणता व्यवसाय करायचा हेही आता व्यवस्थापकीय संचालकच ठरवत असल्याची टीका करत, अशा प्रकारची भूमिका योजनांच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासणारी असल्याचे पाटील म्हणाले.
व्यवस्थापकीय संचालक सरकारची प्रतिमा जाणीवपूर्वक खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा संशयही त्यांनी व्यक्त केला. या मागे कोणाचे राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ आहे का, याची चौकशी सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली. योजनांचा लाभ न मिळाल्यामुळे मराठा समाजातील बेरोजगार युवकांमध्ये तीव्र असंतोष असून, मराठा समन्वयकांच्या माध्यमातून आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या मंगळवारी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात उपसमितीची तसेच मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत महामंडळातील कारभार, लाभार्थ्यांच्या समस्या आणि व्यवस्थापकीय संचालकांविरोधातील तक्रारी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नरेंद्र पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालयाच्या कामकाजावरही नाराजी व्यक्त केली. संग्रहालयाची अवस्था अत्यंत दयनीय असून, त्यातील जागा एका संस्थेला देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. हा प्रकार शिवप्रेमींसाठी अपमानास्पद असून त्याला तीव्र विरोध केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महामंडळाच्या कामकाजाचा आढावा सादर करताना त्यांनी सांगितले की, मराठवाडा विभागात विविध बँकांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांतर्गत आतापर्यंत ४ हजार ९९६ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. व्याज परतावा मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ४७ हजार २८९ असून, आतापर्यंत ४५२ कोटी रुपयांचा व्याज परतावा वितरित करण्यात आला आहे. मात्र, कर्ज मंजुरीतील कठोर अटी आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे योजनांचा अपेक्षित लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
प्रमुख मुद्दे
अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा राजीनाम्याचा इशारा.
व्यवस्थापकीय संचालकांवर मनमानी कारभाराचा आरोप.
१,५०० कोटी अपेक्षित व्याज परताव्यापैकी केवळ १५२ कोटींचे वितरण झाल्याचा दावा.
बेरोजगार युवकांच्या कर्ज योजनांवर निर्बंध असल्याची टीका.
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न पुन्हा उपस्थित करण्याची घोषणा.
मराठा समाज आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या