पलूस, दि. २७ : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपआप्पा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जनसेवा सप्ताहा अंतर्गत कराड-तासगाव रोड, पलूस येथील शिवशंभो मल्टीपर्पज हॉल येथे भव्य शेतकरी मेळावा आणि 'स्व. अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार' वितरण सोहळा संपन्न झाला.
यावेळी प्रास्ताविक करताना प्रदीपआप्पा कदम म्हणाले, शेतकरी सुखी आणि संपन्न झाला तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आवश्यक योजना तातडीने राबवण्यावर अजितदादांचा भर असायचा. पलूस तालुक्यातील अनेक शेतकरी विविध तंत्रज्ञान वापरून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. स्वर्गीय अजित दादांच्या नावाने पुरस्कार देऊन अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कमी खर्चात अधिक उत्पादन आणि शाश्वत शेतीचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वीकारला पाहिजे.
एआय टेक्नॉलॉजी तज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ तथा शरद कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शांतीकुमार पाटील यांनी शेतकऱ्यांना Artificial Intelligence (AI), Precision Farming, डिजिटल कृषी व्यवस्थापन आणि स्मार्ट शेती या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पिकांची वाढ, जमिनीतील ओलावा, हवामानातील बदल, रोग व किडींचा प्रादुर्भाव यांचे अचूक विश्लेषण करून वेळेवर निर्णय घेता येतात. त्यामुळे उत्पादन वाढते, खर्च कमी होतो आणि शेती अधिक नफ्याची बनते, असे त्यांनी सांगितले. भविष्यातील शेती ही तंत्रज्ञानाधारित असेल आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आधुनिक साधनांचा स्वीकार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विज्ञान संत अंकुश पाटील यांनी कमी खर्चात किफायतशीर शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. पिकांचे नियमित निरीक्षण, माती परीक्षण, संतुलित खत व्यवस्थापन आणि योग्य औषधांचा वैज्ञानिक वापर केल्यास उत्पादन आणि उत्पन्नात मोठी वाढ शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावर उपाययोजना करत असताना अत्यंत माफक खर्चात कशाप्रकारे औषधे तयार करायची याबाबतचे मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरलेल्या 'स्व. अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार' वितरण सोहळ्यात महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेले कृषिभूषण रवी पाटील, कृषिभूषण तात्यासाहेब नागावे, शेतीनिष्ठ जयकर माने, कृषिभूषण अशोक खोत तसेच क्रांती साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन पोपटराव संकपाळ यांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावर्षीचा 'स्व. अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार' प्रतापसिंह पाटील (भवानीनगर), अरुण माळी (बोरजाईनगर), ज्ञानदेव गुरव (नवे खेड), श्रद्धा तालवर (आंधळी), प्रमोद गोविंद पवार (बुर्ली), महादेव नामदेव लाड (कुंडल), संदीप रामचंद्र पवार (खटाव), अभिजीत डाके (सांगली), संपत जाधव (आंधळी), विजय दत्तात्रय पवार (बांबवडे), विलास भानुदास पाटील (मोराळे), विशाल राजेश पाटील (मोराळे), सुनिल शामराव भोसले (बांबवडे), माणिक तुकाराम माने (आंधळी), अंकुश वसंत पाटील (आमणापूर) आणि विजय लक्ष्मण शिंदे (मोराळे) या प्रगतशील शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले.
स्वागत अमीर पठाण यांनी केले. अंकुश राजमाने यांनी निवेदन तर विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शिंदे यांनी आभार मानले.
यावेळी वनस्पती रोगशास्त्र तज्ज्ञ डॉ. विशाल कारंडे, कृषिभूषण रवी पाटील, तात्यासाहेब नागावे, जयकर माने, वसंत पाटील (सांगली), रोहित पाटील, कैलास पाटील (नवे खेड), माजी सरपंच प्रदीप चव्हाण, अजिंक्य माने, बांबवडेचे सरपंच अरविंद मदने, राहुल पाटील, रणजीत शिंदे, अनिल पाटील, उल्हास पाटील, अभिजित कौलगे, भास्कर संकपाळ, तौफीक मुल्ला, सागर कदम, तुषार सूर्यवंशी, विजय खारकांडे, आशिष सूर्यवंशी यांच्यासह विविध गावांतील शेतकरी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा सन्मान या त्रिसूत्रीचा प्रभावी संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम जनसेवा सप्ताहातील एक उल्लेखनीय उपक्रम ठरला. शेतकऱ्यांना ज्ञान, प्रेरणा आणि नव्या तंत्रज्ञानाचा आत्मविश्वास देणारा हा मेळावा दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या