सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ‘स्टुडन्ट इंडक्शन प्रोग्रॅम’ संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. डी. जी. कणसे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कणसे म्हणाले की, महाविद्यालय हे ज्ञान, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयातील शिस्तीचे व नियमांचे प्रामाणिकपणे पालन करणे ही आपली जबाबदारी समजावी. नियमित उपस्थिती, वेळेचे पालन, शिक्षक व कर्मचाऱ्यांप्रती आदर, परिसराची स्वच्छता, महाविद्यालयीन संपत्तीचे जतन आणि सभ्य वर्तन यामुळे महाविद्यालयाचे वातावरण अधिक सकारात्मक व प्रेरणादायी बनते.
भविष्यात येणाऱ्या अडचणीची जाणीव विद्यार्थी दशेत असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वच्छता, शिस्तप्रिय व क्रियाशील राहणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचा पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे. या वेळी भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम साहेब यांचा प्रेरणादायी संघर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला.
तीन दिवस चाललेल्या या उद्बोधन कार्यक्रमात काही तज्ज्ञ प्राध्यापकांनी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग, शिष्यवृत्त्या, ग्रंथालय, एन.सी.सी.,क्रीडा विभाग, एन.एस. एस.,प्लेसमेंट सेल, लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरण, परीक्षा विभाग, विविध कोर्सेस याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. कणसे यांनी केले.
या प्रसंगी महाविद्यालयातील उपप्राचार्य नॅक समन्वयक डॉ. अमित सुपले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.अमोल कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. तर आभार डॉ. डी.व्ही.फड यांनी मानले.
या वेळी कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. रविंद्र काटकर, एम. एल. टी. विभागप्रमुख डॉ. आनंदा सपकाळ यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विभागप्रमुख, शिक्षकेतर सेवक व प्रथम वर्षात शिकणारे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या