प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 28 : नागरिकांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित अडचणी सोडवल्या जाव्यात, या उद्देशाने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत. हा नागरिक संवाद कार्यक्रम गुरुवार, दि. 30 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, विजयनगर, सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात होणार आहे. गरजूंनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्न, नागरिकांच्या समस्या यांना या संवाद कार्यक्रमातून व्यासपीठ उपलब्ध होणार असून, या माध्यमातून नागरिकांना आपल्या अडचणी थेट पालकमंत्र्यांसमोर मांडता येतील. तरी जिल्ह्यातील गरजूंनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाशी थेट संवाद साधून आपल्या अ़डचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कार्यपद्धती लोकाभिमुख राहिली आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तातडीने निर्णय घेणे, संबंधित विभागांना आवश्यक सूचना देणे आणि कामकाजात गती आणण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे या संवाद कार्यक्रमातून नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक मार्ग निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या