प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 25 - दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करावा अशी आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठोबाच्या चरणी प्रार्थना केली आहे. दुष्काळी भागाला अधिकाधिक निधी देऊन, या भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली. कवठेमहांकाळ तालुक्यातील श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान आरेवाडी येथे बिरोबा दर्शन घेतल्यानंतर शेतकऱ्यांची संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रोहित पाटील, माजी खासदार संजय पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, जलसंपदा विभाग पुणेच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, प्रज्ञा यादव, राजन डवरी, अभिनंदन हरूगडे, हर्षद यादव आणि श्री. मासाळ आदि उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, दुष्काळी भागाला न्याय मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसा सिंचन योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. 2014 पासून टेंभू म्हैसाळ उपसा सिंचन योजनांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिल्यामुळे या योजनेची बरीच कामे पूर्ण होऊन दुष्काळी भागाला पाणी मिळू लागले आहे. दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी उपमुख्यमंत्री आर. आर पाटील या दिवंगत नेत्यांसह अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. टेंभू योजनेसाठी नाबार्ड मधून 617 कोटी रुपये मंजूर आहेत. तसेच म्हैसाळ योजनेसाठी 919 कोटी रुपये मंजूर आहेत. टेंभू विस्तारित योजनेचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण करू. तसेच येत्या एक ते दोन वर्षात उपसा सिंचन योजनांची कामे पूर्ण करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच येथील विविध मागण्या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊ असे त्यांनी सांगितले.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, टेंभू व म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी या योजनेचे जुने पंप बदलणे आवश्यक असून विस्तारित टेंभू योजनेचे काम तात्काळ पूर्ण करावे. या माध्यमातून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्यासाठी या परिसरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा व्हावा. सर्व लोकांना पाणी मिळावे, असे आवाहन करून श्री बिरोबा देवस्थानच्या विकासासाठी 150 कोटी रुपयांचा निधी मिळवून या मंदिराचा कायापालट करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
आमदार रोहित पाटील म्हणाले, बिरोबा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा. विस्तारीत टेंभू योजना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कामे गतीने पूर्ण करून या परिसराचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देऊन कामांना गती द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
आपल्या कालावधीत टेंभू योजनेसाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन माजी खासदार संजय पाटील यांनी या योजनेची उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.
प्रास्ताविकात सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम यांनी टेंभू म्हैसाळ योजनेच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली.
श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टचे राजाराम कोळेकर यांनी बिरोबा मंदिर परिसर विकासासाठी निधी लवकरात लवकर मिळावा. तसेच टेंभू योजनेचे पाणी मिळावे जेणेकरून यात्रा कालावधीत भाविकांना पाणी टंचाईची कमतरता भासणार नाही, अशी मागणी यावेळी केली.
सूत्रसंचालन संगीता मोरे यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता अमोल गुरव यांनी मानले. कार्यक्रमास आरेवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या