प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: तालुक्यातील मणेराजुरी येथे बुधवारी दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत आई आणि मुलीचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला.मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहताच तिला वाचविण्यासाठी तलावात उतरलेल्या आईलाही पोहता येत नसल्याने दोघींचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने मणेराजुरीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सत्वला संतोष जाधव (वय २८) आणि मंजू संतोष जाधव (वय ७) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. जाधव कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील असून उदरनिर्वाहासाठी सुमारे महिनाभरापूर्वी मणेराजुरी येथे वास्तव्यास आले होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब परिसरातील बागायतदारांकडे गाढवांच्या साहाय्याने बांधावर माती टाकणे, खतांची वाहतूक करणे आदी मजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह करत होते.बुधवारी दुपारी काम आटोपल्यानंतर सत्वला जाधव आपल्या दोन मुलींना घेऊन वज्रचौडे रोडलगत भोसलेनगर परिसरातील चिमणखोरा पाझर तलावावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. तलावात म्हैशाळ योजनेचे पाणी साठले असून सध्या तलाव अर्ध्याहून अधिक भरलेला आहे.धुणे धुत असताना मंजू ही आईपासून काही अंतरावर खेळत असताना पाण्याकडे गेली. अचानक ती खोल पाण्यात जाऊन बुडू लागली.आपल्या मुलीचा जीव धोक्यात असल्याचे पाहून आई सत्वला यांनी क्षणाचाही विलंब न लावता तिला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली.मात्र दुर्दैवाने दोघींनाही पोहता येत नसल्याने त्या पाण्याच्या खोल भागात अडकल्या आणि बुडाल्या.घटनेच्या वेळी तलाव परिसरात कोणीही नसल्याने तात्काळ मदत मिळू शकली नाही.काही वेळानंतर ग्रामस्थांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील दीपक तेली यांनी तातडीने तासगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांच्या मदतीने दोघींचे मृतदेह तलावातून बाहेर काढले.
मृतदेह तासगाव ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे.
■ प्रसंगावधानामुळे टळला आणखी अनर्थ
या दुर्घटनेवेळी सत्वला जाधव यांची मोठी मुलगी तलावाच्या काठावर उभी होती. आई आणि बहीण पाण्यात बुडताना पाहूनही तिने घाबरून तलावात उडी न मारता धीराने प्रसंगावधान राखले. तिने तातडीने मोबाईलवर आपल्या आजोबांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तिच्या या समंजसपणामुळे आणखी एक जीवितहानी टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या