मुंबई / सांगली : सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मूलभूत पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मुंबईतील 'सह्याद्री अतिथीगृह' येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान शहराच्या दृष्टीने अत्यंत कळीच्या असलेल्या पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जागतिक बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून सांगलीच्या विकासाला गती देण्यासाठी आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्र्यांना विशेष निवेदन सादर केले. या निवेदनात प्रामुख्याने दोन मोठ्या प्रकल्पांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे:
वारणा नदी उद्भव आधारित पाणीपुरवठा योजना: सांगली शहराच्या भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, वारणा नदीवरून पाणी उपलब्ध करून देणाऱ्या योजनेसाठी सुमारे ४५४ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
शेरीनाला व मलशुद्धीकरण प्रकल्प: शेरीनाला, वखारभाग येथील उंच मलशुद्धीकरण केंद्र (STP) उभारणे आणि इतर अनुषंगिक कामांसाठी सुमारे ९३.५० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे आमदार गाडगीळ यांनी अधोरेखित केले.
"सांगली-मिरज-कुपवाड शहराचा दीर्घकालीन विकास साधण्यासाठी वारणा पाणीपुरवठा योजना आणि शेरीनाल्याचा प्रश्न मार्गी लागणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावेल," असे मत आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी यावेळी व्यक्त केले.
आमदार गाडगीळ यांनी मांडलेल्या विषयांचे महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी यावर सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. जागतिक बँकेच्या निधीतून ही कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
या भेटीमुळे सांगलीच्या प्रलंबित विकासकामांना आता मोठी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून, शहरवासीयांकडून याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या