गगनबावडा : शासकीय मोजणी प्रक्रिया ही पारदर्शक आणि नियमानुसार होणे अपेक्षित असताना, सांगशी, तालुका गगनबावडा येथील गट नंबर ९९ च्या मोजणीबाबत धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. तब्बल २५ एकर क्षेत्राची मोजणी अवघ्या अर्ध्या तासात उरकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, या प्रक्रियेत लगतच्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
पळत पळत मोजणी; नियमांना हरताळ
मिळालेल्या माहितीनुसार, आज १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १२ वाजता मोजणीला सुरुवात झाली आणि १२:३० वाजता ती संपलीही. २५ एकर एवढे मोठे क्षेत्र केवळ ३० मिनिटांत मोजले गेल्याने ही 'मोजणी' होती की केवळ 'पळत पळत केलेला स्टंट', असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी केवळ जमिनीचे मालक, मुकादम, दोन मोजणीदार आणि एक लॅपटॉप एवढीच यंत्रणा हजर होती.
लगतच्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले?
मोजणी प्रक्रियेत लगतच्या शेतकऱ्यांना (Adjacent Landowners) नोटीस देणे आणि त्यांची स्वाक्षरी घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असते. मात्र, या प्रकरणात शेजारील महत्त्वाच्या गटांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले आहे:
गट क्र. ९७ (वरेकर), ९२ (शासकीय जमीन), ४१ अ व ब (पडवळ), १ (शेटे), ३ (कांबळे) आणि गावठाण हद्दीचे ग्रामसेवक यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही.
गंमत म्हणजे, ज्यांचा या क्षेत्राशी थेट संबंध नाही अशा गट क्र. ३२ (विलास पडवळ) आणि गट क्र. २८ (तुकाराम पडवळ) यांची नावे मात्र नोटीसमध्ये समाविष्ट करून दिशाभूल करण्यात आली आहे.
वारंवार मोजणीचा 'स्टंट' आणि प्रलंबित आक्षेप
गट नंबर ९९ ची मोजणी १९९२ पासून आतापर्यंत (मे २०२५, जानेवारी २०२६ आणि आता एप्रिल २०२६) सहा वेळा करण्यात आली आहे. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या मोजणीवर लगतचे शेतकरी श्री. पडवळ यांनी लेखी आक्षेप नोंदवला होता. मात्र, संबंधित विभागाने त्यावर अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही. आक्षेप प्रलंबित असताना पुन्हा पुन्हा मोजणीचा घाट का घातला जात आहे, याचे 'गौडबंगाल' काय, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारात धाव घेणार
वारंवार होणाऱ्या या मोजणीच्या प्रकारामुळे लगतचे शेतकरी मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या हैराण झाले आहेत. ही मोजणी पारदर्शक आणि कायदेशीर निकषांनुसार का होत नाही? मोजणी कोणाच्या दबावाखाली केली जात आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मनमानी कारभाराची सविस्तर तक्रार पुराव्यांसह लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
"२५ एकर जमीन अर्ध्या तासात मोजून पूर्ण होणे हे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. लगतच्या शेतकऱ्यांना नोटीस न देणे हा त्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे. या अन्यायाविरोधात आम्ही शेवटपर्यंत लढू."
- सुरेश शेटे, सांगशी
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या