प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : सावर्डे येथील कै.सौ. कलावती आप्पासाहेब जाधव यांचे सोमवार दि. १३ रोजी दुःखद निधन झाले.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संसाराचा गाडा ओढत आपल्या कष्ट, जिद्द आणि त्यागाच्या जोरावर त्यांनी केवळ कुटुंब उभे केले नाही, तर मुलांच्या भवितव्यालाही सुवर्ण स्पर्श दिला.अल्पशिक्षित असूनही शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षणापासून चांगले संस्कार दिले. आईच्या कष्टाची जाणीव ठेवून मुलांनीही मेहनतीच्या बळावर व्यवसायात यश मिळवले आणि आज त्यांच्या कुटुंबाची सोन्या-चांदीची सहा दुकाने उभी आहेत. एका मातेच्या त्यागातून उभे राहिलेले हे यश गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही कलावती जाधव यांनी कधीही संकटापुढे हार मानली नाही. संसार सावरताना त्यांनी मुलांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त आणि व्यसनमुक्त जीवनाचे संस्कार रुजवले. त्यामुळे आज त्यांची तिन्ही मुले यशस्वी उद्योजक असूनही साधेपणा आणि संस्कार जपत आहेत.
त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी मातृत्वाची दखल घेत गेल्याच वर्षी त्यांना राज्यस्तरीय “आदर्श माता पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले होते. मात्र आपल्या कष्टातून कुटुंबाला उभारी देणारी ही माय आता काळाच्या पडद्याआड गेल्याने सावर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
“आई गेली, पण तिच्या कष्टाची सावली आयुष्यभर साथ देत राहील,” अशा भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या