प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी बाबा गुरबचन सिंह जी महाराज यांच्या पावन स्मृतींना उजाळा देण्यासाठी "मानव एकता दिवस" निमित्त उद्या तासगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात मानवतेचा संदेश अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सकाळी ८.०० ते रात्री ८.३० या वेळेत संत निरंकारी सत्संग भवन, तासगाव-विटा रोड, तासगाव येथे दिवसभर सुरू राहणार आहे.संत निरंकारी मंडळ सातारा झोनचे प्रभारी आदरणीय नंदकुमार झांबरे जी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून समाजात प्रेम, सेवा आणि बंधुत्वाचा संदेश पोहोचविण्याचा मिशनचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. रक्तदान हे केवळ दान नसून ते दुसऱ्याला जीवन देण्याचे सर्वोच्च कार्य असल्याची भावना मिशनच्या प्रत्येक उपक्रमामागे असते.संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून देश-विदेशात आध्यात्मिक जागृतीसोबतच विश्वबंधुत्वाची भावना जोपासण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, युवकांना नैतिक मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धन यांसारख्या अनेक उपक्रमांतून मिशन समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे काम करत आहे.याच दिवशी सायंकाळी ६.३० ते ९.०० या वेळेत सत्संग सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले असून, सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने मानव एकात्मता, निस्वार्थ सेवा आणि बंधुत्वाचे संस्कार समाजात अधिक दृढ करण्याचा संदेश दिला जाणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही तासगाव तालुक्यातील युवक, नागरिक आणि सेवाभावी व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे आणि मानवतेच्या या पवित्र कार्यात आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन संत निरंकारी मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.रक्ताच्या एका पिशवीतून अनेकांना जीवनदान मिळू शकते, त्यामुळे उद्याचा हा उपक्रम तासगावातील सामाजिक जाणीवेचा एक प्रेरणादायी सोहळा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या