प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कारभाराविरोधात सामान्य नागरिक, शेतकरी आणि मालमत्ताधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “काम करून घ्यायचे असेल तर लाच द्यावीच लागते” अशी उघड चर्चा आता शहरासह तालुक्यात सुरू झाली आहे. कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चप्पल तुटेपर्यंत हेलपाटे मारायला लावून त्यांच्या खिशावर खुलेआम दरोडा टाकणारे एक संगनमताचे रॅकेट सक्रिय असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
लिपिक, अधीक्षक ते साहेब अशा पातळीवर लाचेच्या पैशाची वाटणी होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली असून, तक्रारदाराला न्याय मागण्यासाठी कोणाकडे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अखेर “मागतील ते पैसे द्या आणि काम करून घ्या” अशी वेळ नागरिकांवर येत असल्याने कार्यालयाच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.भूमी अभिलेख कार्यालयामध्ये सीटी सर्व्हे असलेल्या गावांतील मालमत्ता पत्रकावर वारसा नोंद करणे, बोजा नोंद करणे अथवा कमी करणे, मालमत्तेची फाळणी, जमीन व प्लॉट मोजणी, हद्द निश्चिती, सनद वितरण, जमीन मोजणी शुल्क स्वीकारणे, हद्दीवरील वादांबाबत सुनावणी घेणे व निकाल देणे अशी महत्त्वाची कामे केली जातात. मात्र या प्रत्येक कामासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कारणांनी अडकवले जात असल्याचा आरोप होत आहे.
अर्ज देण्यासाठी गेलेल्या नागरिकांकडून नसलेल्या कागदपत्रांची मागणी केली जाते, मुद्दाम त्रुटी काढल्या जातात आणि वारंवार कार्यालयात बोलावून हेलपाटे मारायला लावले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. या प्रक्रियेत साध्या कामासाठी किमान एक हजार रुपयांपासून तर मालमत्तेची किंमत मोठी असेल तर थेट अर्धा लाख रुपयांपर्यंत लाच उकळली जात असल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे कोणतीही भीडभाड न ठेवता कार्यालयात बसूनच पैशांची उघड उघड वसुली केली जात असल्याचा आरोप सामान्य नागरिकांकडून होत आहे. मोजणी शुल्क ऑनलाइन भरले जात असले, तरी “अर्जंट काम” करून देण्यासाठी मात्र ऑफलाइन पद्धतीने रोख व्यवहार केला जात असल्याचे सांगितले जात आहे.लाचेची रक्कम सुरक्षितपणे आणि कोणतीही फसवणूक न करता पोहोचेल याची खात्री नसल्याने काही लिपिक आणि अधिकारी स्वतःच कार्यालयात किंवा कार्यालयाच्या आवारात पैसे स्वीकारतात, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.परिणामी भूमी अभिलेख कार्यालय हे सर्वसामान्यांसाठी मदतीचे केंद्र न राहता “लाच दिल्याशिवाय काम होत नाही” अशी प्रतिमा तयार झाली आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष का?
भूमी अभिलेख कार्यालय हे आमदार आणि खासदारांच्या कार्यक्षेत्रात येत असतानाही, येथील कथित भ्रष्टाचाराविरोधात कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उघडपणे भूमिका घेतलेली दिसत नाही. “कोणत्या कामासाठी किती पैसे द्यावे लागतात” हे सर्वश्रुत असतानाही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लुटीचा हिस्सा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ‘प्रोटोकॉल’च्या माध्यमातून वरिष्ठांपर्यंत पोहोचतो काय? त्यामुळेच येथील भ्रष्टाचाराला अभय मिळत आहे काय? असे संतप्त सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने सापळे रचावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या