प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :तासगाव तालुक्यात १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उबाठा गटाने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.निमणी, नागाव, नेहरूनगर, येळावी, शिरगाव, कवठे, गोटेवाडी तसेच तासगाव शहर परिसरातील काही भागांना या अवकाळी पावसाचा फटका बसला. द्राक्षबागा, आंबा, ऊस, केळी, भाजीपाला आणि इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः द्राक्षबागांमधील कोवळ्या काड्या तुटून पाने गळाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार छाटणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे.वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या असून घरांच्या पत्र्यांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतीबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचेही मोठे हाल झाले आहेत.शिवसेना उबाठा गटाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात संबंधित महसूल, कृषी आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत, तसेच शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.“शेतकऱ्यांच्या जखमेवर फक्त आश्वासनांची मलमपट्टी नको, तर तातडीची मदत हवी,” अशी भूमिका यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मांडत प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करावी, असा इशारा दिला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या