अमरावती : सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली दि. २१ एप्रिल २०२६ पासून राज्यव्यापी बेमुदत संप सुरू आहे. पहिल्या दिवशी मंत्रालयापासून गडचिरोली जिल्ह्यापर्यंत *८०% कर्मचारी* संपात सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशी हा सहभाग ९०% वर पोहोचला आहे.
काल शासनाकडून *वित्त विभागाच्या सचिवांसोबत* बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, संपाची नोटीस समन्वय समितीने दिलेली असल्याने *"चर्चा थेट मा. मुख्यमंत्री किंवा मा. मुख्य सचिव यांच्याशीच होईल"* ही ठाम व आग्रही भूमिका समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने घेतली. त्यामुळे वित्त सचिवांसोबतची बैठक नाकारण्यात आली व *दुसऱ्या दिवशीही संप सुरूच राहिला.*
*अमरावती जिल्ह्यात संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यातील सर्व प्रमुख शासकीय कार्यालयांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत*.
समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक *श्री. डी. एस. पवार* यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती शहर व जिल्ह्यातील कार्यालयांची पाहणी केली असता *९०% कर्मचारी* दुसऱ्या दिवशीही बेमुदत संपावर आहेत. कर्मचाऱ्यांचा संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
*संपात सहभागी प्रमुख कार्यालये/विभाग :*
महसूल विभाग – विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालये; आरोग्य विभाग – सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, शहर रुग्णालय, हिवताप कार्यालय, हत्तीरोग कार्यालय, कुष्ठरोग कार्यालय; जलसंपदा विभाग, कोषागार विभाग, वस्तू व सेवा कर विभाग (GST), फ्लोरॅसिस लॅब, सहकार विभाग, समाज कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यालयीन कर्मचारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), जिल्हा कोषागार कार्यालय, उपसंचालक शिक्षण कार्यालय, सर्व आय.टी.आय., तंत्रशिक्षण विभाग, कारागृह विभाग, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभाग व इतर सर्व शासकीय-निमशासकीय विभागांतील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
*समन्वय समितीच्या प्रमुख मागण्या :*
शासनाने *१ मार्च २०२४ पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना ( RNPS)* लागू केली, परंतु त्याचे नियम, अटी व स्पष्टीकरणात्मक अधिसूचना अद्याप निघाली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. *१८ वर्षांनंतर जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळण्यासाठी* समन्वय समितीच्या प्रयत्नांमुळे शासनाचे दरवाजे उघडले. कुटुंब निवृत्तीवेतन, रुग्णता निवृत्तीवेतन, सेवाउपदान, रजा रोखीकरण आदी लाभ मिळवून दिले. हे लाभ सहज मिळाले नाहीत – *दीर्घकालीन संघर्ष व कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच शासन नमले.*
दरम्यान, केंद्र शासनाने *१ एप्रिल २०२५ पासून एकात्मिक निवृत्तीवेतन योजना (UPS)* अमलात आणली, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. समन्वय समितीने गेल्या दोन वर्षांपासून सुधारित निवृत्तीवेतनाचे नियम व स्पष्टीकरणात्मक सूचना काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, सात वेळा आंदोलने केली. तरीही शासनाने या योजनेसाठी *विकल्प देण्याची मुदत तीन वेळा वाढवून ३१/१२/२०२६* केली. जोपर्यंत या योजनेची सविस्तर अधिसूचना निघत नाही, तोपर्यंत ही योजना कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची की फसवी आहे, हे कळणार नाही. *"जादूगाराच्या पेटीत काय दडलंय, ते बाहेर आल्याशिवाय कळणार नाही."* ही योजना जुन्या पेन्शनप्रमाणेच असेल तरच कर्मचारी स्वीकारतील, अन्यथा *जुन्या पेन्शनसाठीचा लढा सुरूच राहील.*
*समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली बंद केलेली पेन्शन पुन्हा चर्चेला आणली, चर्चेची दारे खुली केली – हे फार मोठे यश आहे.* काही विरोधक म्हणतात की या संपात जुन्या पेन्शनची मागणी नाही, पण *ही मागणी आपण सोडलेली नाही*, हे सर्वांनी लक्षात घ्यावे. यासोबतच *कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० करणे, व्यापक आरोग्य योजना लागू करणे* अशा एकूण *१८ प्रमुख मागण्या* घेऊन हा संप सुरू आहे.
दुसऱ्या दिवशी शहरातील कार्यालयामध्ये श्री डी एस पवार सुरेश शिर्के ,भास्कर रिठे यांनी फेरफटका मारला असता व संपात सहभागी विविध संघटनेच्या पदाधिकारी मंडळी कडून माहिती घेतली असता सर्व शासकीय कार्यालयामध्ये ठणठणात होता. आज काही कार्यालय अधिकार्यांना उघडावी लागली,पाणी स्वतः घ्यावे लागले व फाईल सुद्धा स्वतः फिरवली हे आजच्या संपाच्या दुसऱ्या दिवसाचे विशेष आहे.
संपात सहभागी झालेल्या सर्व लढवय्या कर्मचाऱ्यांचे समन्वय समिती अभिनंदन करत आहे.
*पुढील वाटाघाटी :* शासनाने आज *दि. २२/०४/२०२६ रोजी दुपारी ५ वाजता मा. मुख्य सचिव व विविध विभागांच्या सचिवांसोबत* समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीतील निर्णयाची माहिती सर्वांना कळविण्यात येईल. *मात्र, ठोस व लेखी निर्णय झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही.* त्यामुळे सर्वांनी संपात सहभागी राहावे. संपाबाबतची प्रत्येक अपडेट ग्रुपवर कळविण्यात येईल.
संपाच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शासकीय कामकाज ठप्प झाले असून, *नागरिकांनी सहकार्य करावे,* असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या