प्रतिष्ठा न्यूज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल वीर बांधवांनी दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
राज्यपालांना तीव्र दुःख
महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. दिवंगत श्री अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
दादा गेले! आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकमग्न श्रद्धांजली
मुंबई, दि. २८: जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, अशा शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांना शोकमग्न श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माझा मोठा भाऊ गेल्याची भावना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई दि.२८: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे, अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्र त्यांना दादा म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गूण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे.
अजितदादांच्या स्पष्ट आणि नर्म विनोदी, मार्मिक कोपरखळ्यांची वैशिष्ट्ये सुद्धा सगळ्यांना आवडते. आमचे सरकार तीन पक्षांचे असले, तरीही निर्णय मात्र एकसंधपणे आणि एकजूटीने घेत आलो आहोत. विशेषतः अगदी प्रारंभीपासून राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजित दादांनी विकास कामांना खीळ बसू न देता अतिशय हातोटीने निर्णय घेतले. राज्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मी मुख्यमंत्री असतांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही योजना असो, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून अजितदादा यांनी वेळोवेळी पाठबळच दिले.
परखड आणि जिथल्या-तिथे निर्णय घेण्याची क्षमता म्हणून दादांचा महाराष्ट्राला परिचय होता. वित्तमंत्री म्हणून त्यांच्याकडे सगळ्याच खात्यांबाबत माहिती असायची. पण म्हणून त्यांनी कधी शिष्टाचाराची चौकट मोडली नाही. धोरणात्मक निर्णय जाहीर करतानाही त्यांनी कधी कुणाला अव्हेरल्याचे दिसत नाही. आपले म्हणणे ते सूस्पष्टपणे आणि अधिकारवाणीने मांडत. त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा धोरणात्मक बैठका आणि विधिमंडळ सभागृहातही अनुभवायला आला.
स्वप्नाळू सादरीकरण आणि केवळ सांगोवांगी गोष्टींपेक्षा ते व्यावहारिक गोष्टी पडताळून पहात. एखादी संकल्पना पुढे आली, की तिचा ते सर्वांबाजूंनी विचार करायला भाग पाडत. ती संकल्पना टिकेल कितपत, तिच्या भविष्यातील देखभालीची व्यवस्था इथपासून, ती लोकहिताची आहे का, कितीजणांसाठी ती उपयुक्त ठरणार आहे, अशा अनेक गोष्टींचा ते विचार करत. ठोस आणि तडकपणे निर्णय घेत असल्याने विधिमंडळातील आमदार आणि मंत्रिमंडळातील होतकरू-तरूण मंत्र्यांनाही अजितदादांच्या कार्यशैलीबाबत, दैनंदिनीबाबत कुतूहल असायचे. त्यांनाही वेळप्रसंगी ठणकावयाला ज्येष्ठत्वाच्या नात्याने दादा मागे पुढे पाहत नसत. छोट्या-मोठ्या गोष्टींचाही लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. आपल्या निर्णयाचा लोकांच्या जीवनावर कसा आणि काय परिणाम होतो, याचा अभ्यास करायला हवा असा त्यांचा आग्रह असायचा. त्यामागे चूका काढण्याची नव्हेतर, त्यांची पुनरावृत्ती होऊ नये याची तळमळ असायची.
आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटी म्हणतात.
अजितदादांच्या जाण्याने मनाला चटका-मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. 28 : दादा अशी एक्झिट घ्यायची नव्हती!! ... तुम्ही जीवाला चटका लावून गेलात... तुम्ही सदैव स्मरणात रहाल.. तुमच्याबरोबर प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या.. तुमचा राजकीय आणि अॅकडमिक सेन्स खूप जबरदस्त होता. तुमच्या भाषणातून, विनोद बुद्धीने तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं.. पण आज तुमच्या जाण्याने तुम्ही कार्यकर्त्यांना रडवलं..असा अनुभवी नेता होणे नाही .. महाराष्ट्र एका डायनॉमिक नेत्याला मुकला.. गोपीनाथ मुंडे परिवारातर्फे आदरांजली, अशा शब्दांत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शोकाकुल झालेल्या पंकजा मुंडे यांनी अजित दादांना भावपूर्ण शब्दांत आदरांजली वाहिली.
श्रीमती मुंडे म्हणाल्या की, अजितदादांनी आपल्या कामाने, आपल्या वागण्याने राज्याच्या राजकारणात एक वेगळा दरारा निर्माण केला होता. राजकारणात शब्दांला जागणारे म्हणून सर्वांनाच ते परिचत होते. जनतेत रमणारा, जनतेसाठी झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, यावर विश्वास बसत नाही.
कुशल प्रशासक, दिलेला शब्द पाळणारे व कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले व्यक्तिमत्व म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखले जाते. अशा अजित दादांच्या अकाली निधनाची बातमी मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील सुसंस्कृत दादा व्यक्तिमत्व हरपले. आपल्या अभ्यासू वृत्तीने व कामाच्या झपाट्याने वेगळा ठसा उमटविणाऱ्या दादांना महाराष्ट्र विसरू शकत नाही. हे दुःख पचविण्याची ताकद परमेश्वर पवार कुटुंबियांना देवो, अशा शब्दांत श्रीमती मुंडे यांनी शोक व्यक्त केला.
महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू आणि कर्तबगार नेता हरपल - मंत्री जयकुमार रावल
मुंबई दि.28:- महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, या सह सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी, कर्तबगार, अजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.अशा शब्दात अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेती, जलसंपदा, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच संवेदनशील राहिले. कठोर निर्णयक्षमता, प्रशासनावर मजबूत पकड, आणि स्पष्टवक्ता म्हणून त्यांच्या नेतृत्वाची ओळख होती.
तसेच माझ्या शालेय जीवनापासून त्यांच्याशी सबंध आणि संवाद होता. पुण्याचे सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये मी शिकत असताना त्यांनी मला बोलवून माझी मुलाखत घेतली होती. नंतरच्या काळात राजकारणात आमदार झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासाच्या अनेक योजनांना सहकार्य केले. साक्री तालुक्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प मागणी केल्यानंतर त्यांनी मंजूर केला. काल झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये राज्यातील सोयाबीन, तूर खरेदी आणि एकूणच पणन संदर्भात अनेक विषयात चर्चा करून मार्गदर्शन केले.
त्यांच्या निधनाने केवळ एका राजकीय नेत्याचा नव्हे, तर राज्याच्या विकासप्रक्रियेला दिशा देणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. ही हानी भरून न निघणारी असून महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल.असे मंत्री रावल म्हणाले.
या दुःखद प्रसंगी, त्यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयांप्रती मी शोकसंवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबीयांना हे असह्य दुःख सहन करण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या