प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : ताळीकोट, यादगीरसह परिसरातील जनतेची अनेक दशकांपासूनची मागणी असलेल्या आलमट्टी–यादगीर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी 4.5 कोटी रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे, अशी माहिती खासदार रमेश जिगजिणगी यांनी दिली.
यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देताना त्यांनी सांगितले की, आलमट्टी ते यादगीर या 162 कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गासाठी पहिल्या टप्प्यात सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी 4.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. या संपूर्ण रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च 4,500 कोटी रुपये आहे.
ब्रिटिशांच्या काळापासून या रेल्वे मार्गाची मागणी होत आहे. ताळीकोट, यादगीरसह विविध भागांतील नागरिकांनी या मार्गासाठी अनेक वर्षे आंदोलने केली. विविध गावांतील नागरिकांच्या शिष्टमंडळांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्र सरकारकडेही मागणी केली होती.
जनतेच्या मागणीची दखल घेऊन आपण स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली होती. जनतेच्या सातत्यपूर्ण आंदोलनासह आपल्या प्रयत्नांना आता यश आले असून, केंद्र सरकारने या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे, असे खासदार रमेश जिगजिणगी यांनी सांगितले.
आता या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी 4.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून, सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला गती मिळण्याची अपेक्षा आहे. या रेल्वे मार्गामुळे ताळीकोट, यादगीरसह परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या