प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:भारतीय हवामान विभागाने यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता वर्तविल्याने तसेच कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्यामुळे तासगाव शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.या पार्श्वभूमीवर तासगाव नगरपरिषदेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत सोमवार, दि. २२ जून २०२६ पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
नगरपरिषदेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर आवाहनात नमूद करण्यात आले आहे की,कोयना धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळी सातत्याने घटत आहे.उपलब्ध जलस्रोतांचा विचार करून पिण्याच्या पाण्याच्या गरजेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून आवश्यक जलसाठा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याच अनुषंगाने राज्य शासनाकडूनही पाणी कपातीबाबत सूचना प्राप्त झाल्याने तासगाव शहर व परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नागरिकांनी नगरपरिषदेमार्फत पुरविण्यात येणारे पाणी केवळ पिण्याच्या आणि घरगुती अत्यावश्यक वापरासाठीच वापरावे,असे आवाहन करण्यात आले आहे.विशेषतः पाण्याचा वापर गाड्या धुणे,रस्ते धुणे,बागांना पाणी देणे किंवा इतर अनावश्यक कामांसाठी करू नये,असे स्पष्ट करण्यात आले आहे.नगरपरिषदेने गठित केलेल्या पथकांकडून शहरात पाहणी करण्यात येणार असून पाण्याचा गैरवापर आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता नळ कनेक्शन तोडण्याची कारवाईही केली जाऊ शकते,असा इशारा देण्यात आला आहे.पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून नगरपरिषदेला सहकार्य करावे,असे आवाहन मुख्याधिकारी,पाणीपुरवठा सभापती,उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष यांनी संयुक्तरित्या केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या