प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 15 : पाणी ही मर्यादित संपत्ती आहे, ती आपण नव्याने निर्माण करू शकत नाही. या भागातील नद्या बारमाही नाहीत, पावसाच्या पाण्याने त्या प्रवाहित होतात. त्यामुळे जलपुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक असून, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.सांगली पाटबंधारे मंडळाच्या वतीने आयोजित “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2026” च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वारणाली वसाहतील सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमास सांगली पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, अभिनंदन हारूगडे, के. एल. मासाळ, प्रज्ञा पाटील, हर्षद यादव आणि राजन डवरी, जिल्हा जलसंधारण अधिकारी बाळासाहेब आजगेकर आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता सावळे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्ह्यातील नद्या बारमाही नसल्यामुळे पाण्याचे नियोजन अधिक काटेकोरपणे करावे लागेल, यासाठी भूजल पातळी वाढवण्यासाठी पर्जन्यजल पुनर्भरण विषयी जनजागृती करावी. तसेच, उपसा सिंचन योजनांच्या पाणी वापराच्या अनुषंगाने शेतकरी व पाणी वापर संस्थांशी संवाद वाढवून त्यांना या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि संरक्षण करण्याची गरज समजावून सांगणे गरजेचे आहे. यामध्ये महिलांनाही सहभागी करून घ्यावे. कालवे व धरण परिसर स्वच्छता तसेच नदी प्रदूषण रोखणे व पाणी वापर जपून करणेबाबत या पंधरवड्यात अधिकाधिक जागरुकता निर्माण करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जिल्ह्याच्या एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी ६० ते ७० टक्के क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. जे नव्याने प्रकल्प प्रस्तावित आहेत, ते जर पूर्ण झाले तर १०० टक्के लागवडीखालील क्षेत्र सिंचनाखाली येईल. अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये शासनाची मोठी गुंतवणूक असते, त्यामुळे सिंचन योजना चालवण्यासाठी जलव्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण व्हावे. तसेच, उपसा सिंचन योजनांचे वीजबिल भरताना अडचणी येऊ नयेत यासाठी पाणीपट्टीची वसुली वेळेवर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सांगली जिल्ह्यातील 10 नद्यातील पाण्याचे जलकुंभ पूजन करण्यात आले. यानंतर दीपप्रज्वलन तसेच, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच, या पंधरवड्यात सर्व संबंधित विभाग, शेतकरी, पाणी वापर संस्था व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून जलसंवर्धनाच्या या अभियानास यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यकारी अभियंता रोहीत कोरे यांनी आभार मानले. यावेळी जलसंपदा विभाग, त्याचप्रमाणे भूजल सर्वेक्षण विभाग, जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या