प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : मागील दोन ते तीन दिवसांपासून तासगाव तालुक्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून, बाधित क्षेत्रांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मैनक घोष यांनी दिली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आशा निर्माण झाली आहे.जिल्हा परिषदेचे सदस्य अमित उर्फ विशालदादा पाटील यांच्या समवेत निमणी, नागाव, नेहरूनगर, शिरगाव आणि बेंद्री येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मैनक घोष यांची भेट घेतली. यावेळी गारपीट व अवकाळी पावसामुळे द्राक्ष, ऊस, भाजीपाला तसेच विविध फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.
शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्रांचे त्वरित पंचनामे करून संबंधित विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी तसेच शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली. यावर जिल्हाधिकारी मैनक घोष यांनी सर्व बाधित क्षेत्रांचे पंचनामे करून सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी ग्वाही शेतकरी प्रतिनिधींना दिली.या निर्णयामुळे सलग नैसर्गिक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून मदत प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.या शिष्टमंडळात नागाव विकास सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, राहुल पाटील, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत आडके, ज्ञानदेव पाटील, विठ्ठल आडके, प्रकाश पवार, अक्षय पाटील, संजय पाटील, जिनेंद्र पाटील, संजय हरोळे, विकास पाटील, धनंजय दुकाने, दीपक कोळी, रावसाहेब कोळी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या