सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र एस.टी. कामगार संयुक्त कृती समितीने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून, "एकच धून – १५, २२, २९ जून" या घोषवाक्यासह आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली आहे. वेतन, भत्ते, कंत्राटी भरती, ई-बस खरेदी, वैद्यकीय सुविधा आदी मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात येत असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे.
कृती समितीच्या म्हणण्यानुसार, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सेवा विषयक अनेक मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत. महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आली असली तरी त्याची थकबाकी देण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे.
आंदोलनाचा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम
१५ जून २०२६ : राज्यातील सर्व आगार व कार्यालयांमध्ये महाआरती, घंटानाद आंदोलन करण्यात येणार असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले जाणार आहे.
२२ जून २०२६ : राज्यातील सर्व आगार, विभागीय कार्यालये व कार्यशाळांच्या प्रवेशद्वारांवर "दार सभा" घेऊन कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
२९ जून २०२६ पासून : मुंबई येथील वाहतूक भवन, सर्व विभागीय कार्यालये, कार्यशाळा आणि मध्यवर्ती कार्यालयांसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
प्रमुख मागण्या
एस.टी. कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करावे.
नोव्हेंबर २०२१ पासूनची वेतनवाढ आणि घरभाडे भत्त्याची थकबाकी अदा करावी.
महागाई भत्त्याची थकबाकी तातडीने द्यावी.
कंत्राटी कामगार भरती बंद करावी.
महामंडळाने स्वतःच्या मालकीच्या ई-बस खरेदी कराव्यात.
कॅशलेस वैद्यकीय सुविधा लागू करावी.
एस.टी. महामंडळासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी.
नव्या बस बांधणीचे काम महामंडळाच्या कार्यशाळांमध्येच करावे.
कृती समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात राज्यभरातील एस.टी. कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सांगली विभागातही आज महाआरती, घंटानाद आणि निवेदन सादर करून आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या